top of page
वृत्तमानस

टाटांना गरिबांकडून ‘टाटा‘

ज्यांची विश्वरत्न म्हणून ओळख असावी असे भारताचे रत्न अखेर अनंतात विलीन झाले. केवळ भारतानेच नव्ह तर संपूर्ण जगाने ज्यांचे कौतुक करावे त्यांच्या वागण्याचे अनुकरण करावे अशी ही महान व्यक्ती भारतातील तमाम तरुणांना पोरके करून गेली. उद्योग धंद्यात उतरू पाहणाऱ्या स्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या तरुणांसाठी रतन टाटा एक ऊर्जा होती. संस्कृतीचा आणि मानवतेचा महामेरू म्हणून त्यांना ओळखले जायचे. अशा या भारत पुत्राने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाळाने भारताची जी हानी झाली आहे ती भरून निघणे शक्य नाही. कारण कलयुग म्हटल्या जाणाऱ्या या देशातील ग्राहक वर्गाची लूट करून गडगंज संपत्ती जमविणाऱ्यांपैकी रतन टाटा बिलकुल नव्हते. त्यांच्या देशासाठीच्या कार्याला तोड नाही. गेल्या काही दशकांपासून भारतात उभे राहिलेल्या काही उद्योगपतींकडून उद्देश लुटायला घेतला आहे. कोरोना सारख्या महामारी सुद्धा मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले आहे. या महामारीच्या संकटाला संधी समजून लोकांच्या खिशात हात घालणारे व्यापारी आणि या महामारीला संकट समजून गरिबांसाठी स्वतःचा खजिना रिकामे करणारे रतन या देशातील तमाम कामगार तिकीट गरिबांचे रत्न होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांची सातासमुद्रापार ख्याती होती.


त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वतः ट्विट करत त्यांनी देश वासियांना आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. "माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही"असे टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतले जाते. त्यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवले असे नाही तर त्यांनी माणसे जपली. कोरोना काळात देशावर मोथे संकट कोसळले होते, त्यावेळी टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिले होते. तर दुसरीकडे याच काळात काही उद्योगपतींनी देशात लुटमार सुरू केली होती. टाटा यांच्या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. त्यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिले जायचे. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झाले. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवले. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतले जाते. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून त्यांना तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत त्यांनी जनहित जपण्याचे काम कधीच सोडले नाही.


उद्योगक्षेत्रात सर्वांची मने जिंकली. ते एक माणूस म्हणून श्रेष्ठ व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला. ते आपल्या कंपन्यांमधील कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या थेट संपर्कात जाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांशी तसा संवादही साधला. ते कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रचंड काम करायचे. त्यांच्या प्रेमामुळे कर्मचारीदेखील टाटा यांच्यावर तितकाच प्रेम करायचा.


टाटा यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. दुर्दैवाने या महान व्यक्तिला त्यांच्या हयातीत भारतरत्न न मिळाल्याची खंत त्यांच्या चाहत्यांना, देहाभक्तांना नक्की वाटत असेल. 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने आणि 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. परंतु त्याही उपर जाऊन त्यांना भारतरत्न देणे क्रमप्राप्त होते. आजवर अनेक हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत जे हयात आहेत. त्यांचे कार्य नक्कीच मोठे होते म्हणून ते भरारत्नचे मानकरी झाले, पण टाटा यांना देखील ह सन्मान त्यांच्या हयातीत मिळणे आवश्यक होते. अर्थात या देशातील समाजसेवा करण्याचे काम त्यांनी कोणत्याही पुरस्कारासाठी केलेले नाही. म्हणूनच ते विश्वरत्न ठरतात. त्यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आले होते. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आले होते. माध्यमांसोबत बोलताना टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही चालू ठेवण्या मागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये आजही काम बंद ठेवण्यात आलेले नाही. कारण, 'मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचे, कामगारांचे नुकसान व्हायला नको असे स्वतः टाटांनी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होत. म्हणूनच त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या अंत्यविधीच्या वेळीही कामगार कंपनीत काम करत होते. असा मालक होणे नाही. अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्स युनिटमधील कामगारांनी उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती, याची आठवणही कर्मचाऱ्यांनी काढली. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या. टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड येथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे माध्यमांसोबत बोलताना कामगार म्हणाले," आमच्यासाठी हा खूप दुःखद दिवस आहे. या दिवसाचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.


टाटा मोटर्सचे अनेक प्लांट आहेत, मात्र पुण्याच्या ठिकाणाची एक वेगळी ओळख होती. रतन टाटा जेव्हा इथे यायचे, तेव्हा ते पहिल्यांदा आपली इच्छा व्यक्त करायचे. ते कामगार युनियनचा खूप आदर करत होते, त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा इथेच केली, आम्ही त्यांचा वारसा सुरू ठेवू इच्छितो, त्यांनी कोविडच्या काळात जे केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही, असे सांगत कर्मचारी भावूक झाले. टाटा साहेब गेल्यामुळे आम्ही अनाथ झालो' असे कर्मचारी बोलत होते.


यावरूनच त्यांच्या कामाची आणि कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेली अस्था दिसून येते. टाटा यांनी देशभरात जय मोठे कार्य उभे केले आहे त्या कार्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता इतर उद्योगपतींनी घ्यायला पाहिजे. उद्योग हा पोटापुरता असला पाहिजे. व्यापाराच्या नावे देशातील जनतेची लूट करणारे श्रीमंत जरूर होतील परंतु जो सन्मान, जे प्रेम टाटांना मिळाले आहे तशा प्रेमाचे मानकरी मात्र त्यांना होता येणार नाही. अनेक सन्मान हे मिळते परंतु सुद्धा सन्मानामध्ये जनतेच्या मनात मात्र आपुलकी नसेल. इतर उद्योगपतींनी श्रीमंत व्हायचे की टाटां सारखे सन्मानास पात्र हे ज्याचे त्याने ठरवावे.

4 views0 comments

Recent Posts

See All

भाजपने काँग्रेसचा निकाल लावला

चमत्कारावर अनेकांचा विश्वास नसला तरी हरियाणातील निकाल पाहता त्यावर विश्वास नसणाऱ्यांचाही विश्वास बसेल अशीच परिस्थिती समोर आली आहे. या...

Comentarios


bottom of page